मुंबई :– बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी ‘राम सेतू’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट सुरुवातीपासूनच नावामुळे चर्चेत आहे. परंतु त्याचा हा चित्रपट आता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

निर्मात्यांनी वास्तविक मुद्दे चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकसानभरपाईचीही मागणी करणार असल्याचे स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर अक्षयला देशातून बाहेर काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग अयोध्या आणि रामेश्वरमसह अनेक पौराणिक ठिकाणी झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझे वकील सत्य सभरवाल यांनी खटल्याचा अंतिम मसुदा केला आहे. मी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. तो त्याचा आगामी ‘राम सेतू’ हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडत आहे. आणखी एका ट्विटमध्ये स्वामींनी अक्षयच्या नागरिकत्वावर हल्ला केला आणि त्याला अटक करण्याबाबतही म्हटले आहे.
स्वामी यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अभिनेता अक्षय कुमार परदेशी नागरिक असल्यास, आम्ही त्याला अटक करण्यास सांगू शकतो आणि त्याला दत्तक घेतलेल्या देशातून (भारत) बाहेर काढू शकतो. अक्षयच्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तो कॅनडाचा नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अक्षयने याबाबत कधीही अधिकृत माहिती दिलेली नाही.