नाशिक :- विधी क्षेत्रात ॲड.जयंत जायभावे यांचे काम प्रभावी असल्याचे गौरवोद्गार बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड. मनन कुमार मिश्रा यांनी काढले.

बार कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या सदस्यपदी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.जयंत जायभावे यांची निवड जाहीर करण्यात आली होती. या संस्थेवर प्रतिनिधीत्त्व करण्याचा बहुमान उत्तर महाराष्ट्र व नाशिकला तब्बल ६२ वर्षांनंतर मिळाला आहे. यानिमित्त ॲड.जयंत जायभावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गोविंदनगर परीसरातील मनोहर गार्डन येथे झालेल्या भव्य सोहळ्यात विधी क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आजवरच्या कारकिर्दीत ॲड. जायभावे यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांच्यातील ज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर होऊ शकेल, असा विश्वास मान्यवरांनी सत्कार समारंभात व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड. मनन कुमार मिश्रा, ॲडीशनल सॉलीसिटर ऑफ इंडिया ॲड. अनिल सिंग, महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल माननीय ॲड. अशुतोष कुंभकोणी, मुंबई उच्च न्यायालयातील सिनीयर कौन्सिल सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया माननीय ॲड. डॅरीयस जे. खंबाता, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष ॲड.वसंत साळुंके, उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र उमप, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी ॲड. अपूर्बा कुमार शर्मा, मध्य प्रदेश बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार चौधरी, उत्तरप्रदेश बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. डॉ. अजय कोचर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. दिलीप पटेल, ॲड.डी. के. शर्मा, ॲड.अमित वैद आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी ॲड.जयंत जायभावे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करतांना, ही निवड ते सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ॲड मनन कुमार मिश्रा म्हणाले, एखाद्या व्यक्तीला समाजात किती आदर आहे, यापेक्षा त्याला घरी किती सन्मान मिळतो ही गोष्ट महत्त्वाची असते. ॲड. जयंत जायभावे यांना समाजजीवनात तर प्रचंड आदर आहेच, सोबत कुटुंब असलेल्या नाशिकमध्ये त्यांचा किती आदर आहे हे या भव्य सोहळ्यातून दिसून येते. खरंतर ॲड. जायभावे यांच्यातील कौशल्य बार कौन्सिल ऑफ इंडियाने साधारणतः सहा वर्षांपूर्वीच ओळखली होते. म्हणूनच त्यांना विधी अभ्यासक्रमाशी निगडित राष्ट्रीय स्तरावरील समितीत सदस्य म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी ही जबाबदारी चोखपणे बजावली. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून देखील ते अमुलाग्र योगदान देतील यात शंका नाही.
ॲड. कुंभकोणी म्हणाले, या सोहळ्याच्या माध्यमातून ॲड. जायभावे यांची लोकप्रियता व त्यांच्या विषयीचा आदर दिसून येतो. त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये जबाबदारी सांभाळत असताना अनेक दिशादर्शक उपक्रम राबविले. त्यांच्यातील या गुण कौशल्यांचा बार कौन्सिल ऑफ इंडिया व पर्यायाने देशभरातील बार कौन्सिलला फायदा होईल.
ॲड. अनिल सिंग म्हणाले यापुढील काळात ॲड.जायभावे देशभरातील 20 लाख वकिलांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नाशिकची ओळख धार्मिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र अशी असली तरी ॲड.जायभावे यांनी या पुण्यनगरीत विधिज्ञांशी निगडीत चर्चासत्रे, कार्यशाळा राबवताना एका प्रकारे वकिलांचा कुंभमेळा अनेकवेळा भरविला आहे.
नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. गोसावी म्हणाले, समितीचे अध्यक्षपद भूषणविणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ॲड. जायभावे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवितांना विधी क्षेत्रात अमुलाग्र योगदान दिले आहे आता राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना अशाच स्वरूपात महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याकडून दिले जाईल असा विश्वास आहे.
अण्णासाहेब पाटील म्हणाले, ऍड. जयंत जायभावे यांनी नेहमी प्रामाणिकपणा व वकिली व्यवसायासह वकिलांच्या हितांचा विचार केला आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर वकिलांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली आहे.
प्रास्ताविकात नागरी सत्कार समितीचे उपाध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे यांनी कार्यक्रम आयोजनामागील रुपरेषा सांगितली. तसेच ॲड.जायभावे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.मनिषा भामरे यांनी केले. नाशिक बार असोसिएशनचे सचिव ॲड.जालींदर ताडगे यांनी आभार मानले. मीना निकम यांनी राष्ट्र वंदना सादर केली व कार्यक्रमाचा समारोप झाला.
सत्काराला उत्तर देताना ॲड.जयंत जायभावे म्हणाले, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या नागरी सत्कार कार्यक्रमात आई शकुंतला जायभावे तसेच आयुष्यात अमूलाग्र मार्गदर्शन करणारे सर डॉ. मो. स. गोसावी उपस्थित राहिल्याने हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. विधी क्षेत्रात कार्यरत वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्लक्ष घटकांसाठी वेचले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत वडील झटत होते. त्यांचाच आदर्श घेऊन भविष्यात समाजातील उपेक्षितांना जलद गतीने न्याय कसा प्रकारे मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. वकिली व्यवसायाकडे आजची तरुणाई गांभीर्याने बघते आहे. पूर्वी अन्य कुठला पर्याय मिळाला नाही तर वकिली व्यवसायाकडे वळायचे. परंतु सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशासाठी तब्बल चार पटींनी अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे विधी शाखेचे शिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच वकिली क्षेत्रात कार्यरत नवोदित वकिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न असेल.
ॲड. जयंत जायभावे यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झाल्याने या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या ॲड. जयंत जायभावे नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष म्हणून सर डॉ.मो.स. गोसावी, उपाध्यक्ष म्हणून ॲड.नितीन ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली. तर समिती सदस्य म्हणून आर्किटेक्ट संजय पाटील, डॉ. शरद पाटील, दीपक बागड, सुजोय गुप्ता, हेमंत धात्रक, वाय. एम. सिंग, सुनील हेकरे, किरण चव्हाण, गुरुमितसिंग बग्गा, जयंत भातांबरेकर यांनी कामकाज पाहिले.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून ॲड.जयंत जायभावे विधी शाखेत आपले योगदान देता आहेत. गेल्या तेरा वर्षांपासून ते महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपद देखील भुषविले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बहुमान मिळाविला आहे. या संघटनेवर १९ उच्च न्यायालयातून प्रत्येकी एक प्रतिनिधीची निवड होत असते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा यांच्यावतीने ॲड.जायभावे आता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व करणार आहेत. गेल्या ६२ वर्षांमध्ये प्रथमच उत्तर महाराष्ट्र व नाशिकला राष्ट्रीय सतरावर प्रतिनिधीत्त्व करण्याचा बहुमान मिळालेला आहे.
ॲड.जयंत जायभावे गेल्या ३५ वर्षांपासून विधी शाखेत आपले योगदान देता आहेत. यापूर्वीदेखील त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळलेली आहे. वर्ष २००० ते मे २०१२ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र स्टेट लॉ कमिशनच्या सदस्यपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी २०१०-११ साली यशस्वीरीत्या सांभाळली. तत्पूर्वी त्यांनी याच संघटनेचे उपाध्यक्षपदही भुषविले होते. विधी शाखेचे शिक्षण देणार्या विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांकरीता मार्गदर्शक म्हणून ते जाबाबदारी पार पाडता आहेत.
त्यांनी विधी शाखेशी निगडीत अनेक पुस्तके लिहिली आहेत. यात सिव्हील प्लीडींग, कन्वेन्सिंग ॲण्ड ड्राफ्टिंग (१९९६), क्रॉस एक्झामिनेशन (सिव्हील ॲण्ड क्रिमिनल) (१९९७), सी.पी.सी. ॲप्रोच टु सिव्हील ट्रायल (२००६), लॉ ऑफ विल्स (२००९) या पुस्तकांसह सी.पी.सी.वर आधारीत मराठी पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. इव्हिडंन्स ॲक्ट- ॲप्रोच टु सिव्हल ट्रायल (२०१५), व्हिजन डॉक्युमेंट ऑफ बार कौन्सिल (२०१९), बीएलईपी बुकलेट (२०२०) अशी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत.
ॲड.जायभावे यांच्या कार्याचा यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मान झालेला आहे. त्यातच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातील विधीज्ञ, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह अभियंते, आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांसह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ॲड.जायभावे यांच्या कार्याविषयीचे कौतुक केले. त्यांचा दृष्टीकोन विधी क्षेत्राकरीता दिशादर्शक आहे. कायदेविषयक, विधी शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने यापुढील काळातही ॲड.जयंत जायभावे यांच्या माध्यमातून अमुलाग्र योगदान लाभेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.