नवी दिल्ली :- अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला ४ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. भारतीय संघ जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.

वर्ल्डकप विजेत्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले.
राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.