लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंकडून इतक्या जागांची मागणी

आगामी लोकसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आहे यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही, मग ती महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना भाजपची युती असो. सध्या प्रत्येक पक्ष आपल्या परीने स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहीर करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 22 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभेच्या एकूण जागा 48 , त्यात भाजपचं मिशन 45 , शिंदेंचा 22 जागांवर डोळा , ठाकरेंचा 19 जागांवर दावा… तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस समसमान वाटपावर ठाम

प्रत्येक पक्षाला लोकसभेत जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. त्यासाठीची मोर्चेबांधणी सर्वांनी सुरु केली आहे. ठाकरे आणि भाजपची युती होती तेव्हा चित्र वेगळं होतं. आता ठाकरेंपासून फारकत घेत एकनाथ शिंदे 40 आमदार आणि 13 खासदारांसह भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या जागांचा तिढा ठाकरे आणि शिंदेसमोरही आहे पण आपण 22 जागा लढवणार असल्याचं शिंदेंच्या खासदारांनी जाहीर केलं आहे. आता राज्यात जागा 48 त्यात भाजपचं मिशन 45 असताना शिंदेच्या खासदारांचा 22 जागांचा दावा हे मोठं आव्हान मानलं जात आहे.

  • 2019 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीमध्ये निवडणूक लढवली होती त्यामध्ये युतीला 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता
  • भाजपने 25 जागा लढवून 23 जागांवर तर शिवसेनेने 22 जागा लढवून 19 जागांवर विजय मिळवला होता
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे 25 आणि 19 जागा लढवल्या होत्या, तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.
  • या आघाडीला फक्त 5 जागांवर यश आलं होतं त्यात राष्ट्रवादीच्या 4 आणि काँग्रेसच्या फक्त 1 जागेचा समावेश होता
  •  आता 2019 पासून परिस्थिती वेगळी झाली आहे, त्यामुळे जागावाटपचं चित्रही वेगळंच असेल

सध्या एकनाथ शिंदेकडे 13 खासदार आहेत आणखी 9 नव्या चेहऱ्यांचा शोध त्यांना घ्यायचा आहे. 2019 मध्ये 4 उमेदवार पराभूत झाले होते त्यापैकी अडसूळ आणि आढळराव पाटील सध्या शिंदेंसोबत आहेत तर उरलेल्या दोन जागांवरही उमेदवारांचा शोध सुरु आहे तर इतर जे नावाजलेले चेहरे आहेत त्यांच्याही नावाची चाचपणी सुरु आहे.

एकीकडे जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली असून दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान सन्मानावरुनही नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. एनडीएमध्ये आम्हाला सपत्न वागणूक मिळत असल्याचं खासदार गजानन कीर्तिकर यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे माविआ असो किंवा महायुती… जागा वाटपाचा विषय येताच प्रत्येक पक्ष स्वतःच्या पारड्यात जास्तीत जास्त जागा कशा येतील, यासाठी कुटिल नीती आखू लागतो हे यातून स्पष्ट होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!