“त्या” वादग्रस्त वक्तव्यावरुन छगन भुजबळांनी राज्यपालांना दिला “हा” सल्ला

 

नाशिक :- राज्यपाल यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई बद्दल हे वक्तव्य अप्रस्तुत असून वाद नको राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज नाशिक येथे पत्रकारांशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

ते म्हणाले की, मुंबई शहराला भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्व असून ब्रिटिशांनी देखील व्यापारासाठी मुंबईला प्राधान्य दिले. मुंबादेवीचा आशिर्वाद आहे मुंबईवर आहेत. देशभरातील सगळ्यांनाच मुंबई हे आवडते शहर असून या शहरात अनेक नामवंत मान्यवर राहत असल्याने या शहराला विशेष महत्व आहे. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यात अदानी आणि अंबानींनसारख्या उद्योगपतींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार, उद्योग, विमानतळ अनेक मुंबईतील कलाकार, गुजराथी, राजस्थानी सर्व धर्मीय हे आपलेच आहेत. त्यामुळे मुंबईचे महत्व कसे कमी करता येईल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याबाबत बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, रात्री उशिरा मला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. पवार साहेब नाशिक दौऱ्यावर असल्याने बैठकीला जाणे शक्य होणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी नाशिकला भरभरून द्यावे, विकास करावा असेही ते म्हणाले.

शिंदे सरकार शपथविधीला एक महिना होऊन देखील मंत्रिमंडळ विस्तार नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एक तारखेच्या केसकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे हेच मुख्य कारण आहे त्यामुळे ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी थांबले असावेत असे सांगत कुठले खाती घ्यायची यावरून भांडण चालू आहेत पण मुख्य कारण सुप्रीम कोर्ट निकाल आहे अशी टिपणी त्यांनी यावेळी केली.

मालेगाव जिल्हा करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मालेगाव जिल्हा बाबत कोणताही नेता अजून बोललेला नाही. पण आपण मिडीया हुशार आहात, अनेक गोष्टी लक्षात आणून देतात. मालेगाव जिल्हा झाला तर कोणते तालुके घ्यावे ? कारण कळवणचे म्हणतात आमचा आदिवासी जिल्हा करा तर चांदवड वाले मालेगावात जायला तयार नाहीत त्यामुळे सर्व गोष्टींचा मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा, लोकांचे मत बघावे आणि मग निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, कांदा हे शेतकऱ्यांचे महत्वाचे पीक आहे. त्यामुळे कांदा प्रश्न हा अतिशय महत्वाचा असून कांद्याच्या दराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे, अतिरिक्त रेल्वे वॅगन उपलब्ध करून देण्यात यावे, याबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा करून कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!