मुंबई :- निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, 19 जुलै रोजी ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या संर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आयागाचे 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्व्ये देण्यात आलेला राज्यातील 92 नगर परिषदा व चार नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.
नाशिक जिल्ह्यातील “या” नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित –
- मनमाड
- सिन्नर
- येवला
- चांदवड
- नांदगाव
- सटाणा
- भगूर