नाशिक (प्रतिनिधी) :- जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतील पाणीसाठा वाढला असून, एकूण क्षमतेच्या 81 टक्के पाणी धरणांत शिल्लक आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पावसाळ्याचा कालावधी बराच शिल्लक असल्यामुळे मान्सूनच्या अखेरीस सर्व धरणांत समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहील व उन्हाळ्यात फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी, पालखेड व गिरणा खोरे धरण समूह असे एकूण लहान-मोठे धरण प्रकल्प आहेत. त्यात गोदावरी धरण समूहात गंगापूर-67 टक्के, काश्यपी-85 टक्के-गौतमी गोदावरी-85 टक्के, आळंदी-100 टक्के याप्रमाणे एकूण साठा क्षमतेच्या 76 टक्के पाणी या धरणांत शिल्लक आहे.
पालखेड धरण समूहात पालखेड-51 टक्के, करंजवण-81, वाघाड-100, ओझरखेड-100, पुनेगाव-80, तिसगाव-100, दारणा-67, भावली-100, मुकणे-84, वालदेवी-100, कडवा-73, तसेच चणकापूर-46, हरणबारी-100, केळझर-100, गिरणा-92, पुनद-47 टक्के याप्रमाणे एकूण साठाक्षमतेच्या तुलनेत धरणे भरलेली आहेत; मात्र नाग्यासाक्या धरणात अवघा चार टक्के, तर माणिकपुंज धरणात शून्य टक्के पाणी आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची एकूण टक्केवारी 81 टक्के आहे. नाशिक, भगूर व इतर परिसराला गंगापूर, काश्यपी, वालदेवी आदी धरणांतून पाणीपुरवठा होतो.