इगतपुरी (प्रतिनिधी) :– तालुक्यात शेकडो अवैध वृक्षांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकास वनविभागाने रंगेहाथ पकडले आहे. या ट्रकमध्ये सुमारे २६ टन लाकूड हस्तगत करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेकडो अवैध झाडांची कत्तल करून वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या वासाळी फाटा येथे ट्रक क्रमांक एमएच 12 एचडी 7856 हा सिन्नरच्या दिशेने जात असताना या ट्रकला अडविण्यात आले.
ट्रक चालकाकडे परवान्याची मागणी केली. मात्र त्याच्याकडे परवाना नसल्याने वनविभागाचा संशय खरा ठरला. वनविभागाने ट्रक उघडून पाहिले असता त्यात आंबा, जांभूळ, सादडा या जातीचे अवैध रित्या तोडलेले वृक्ष गच्च भरलेले आढळून आले. या ट्रकमध्ये अंदाजे 60 हजार रुपये किमतीचे 18 ते 20 घनमीटर लाकूड वाहतूक करताना सापडले. या ट्रकला चालकासहित ताब्यात घेऊन कारवाईसाठी हे वाहन कार्यालयाच्या आवारात आणून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ट्रकचा चालक नितीन एकनाथ खांदवे (रा. अकोले, जि. अहमदनगर) याच्यासह लाकूड घेऊन जाणारे जयेश सदू डगळा व रवी महादू वळवी (दोघेही रा. सुतारपाडा, गुजरात) या तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. दरम्यान, लाकूड वाहतूक हा जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे बंधपत्रे घेऊन तिघांनाही सोडून देण्यात आल्याचे समजते.
ही कारवाई इगतपुरी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, भाऊसाहेब राव, वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागुल, वाहनचालक शेख, वनमजुर निरगुडे, कोरडे, धोंगडे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.