मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे झाले आहेत.
यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, आतापर्यंत चार आरोपपत्र दाखल करण्यात आले. चौकशी अधिकार्याला मुख्यमंत्र्यांना खूश करायचं आहे. तो प्रयत्न करत होता. त्या प्रयत्नात एक आत्महत्यासुद्धा झाली. त्याने आमच्या बोलावलेल्या प्रत्येक माणसांना काय काय बोलला हे सगळ्यांनी मला येऊन सांगितलं. त्यामुळे त्या चौकशी अधिकार्यांची हतबलता आणि लाचारी दिसत होती.
कारवाई राजकीय आकसापोटी
राजकीय आकसापोटी ही कारवाई सुरु असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे आरोपपत्राला फारसं महत्त्व द्यायचं नसतं हे सर्व सुरुच असतं. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी ठाण्यामध्ये धावपळ सुरु असते. ज्यांनी माझ नग्न छायाचित्र काढलं होतं. आता मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाड याला येनकेन प्रकारे त्रास द्यायचा आहे. मला अडचणीत आणायचं आहे मला घाबरवायचं आहे. पण, मी अडचणी किंवा बाकी कुठल्याही गोष्टीला घाबरत नसल्याचं जितेंद आव्हाड म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
5 एप्रिल 2020 रोजी आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी बंगल्यावर नेऊन करमुसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातलं हे चौथं आरोपपत्र असून, त्यात आव्हाड यांच्यावर 120 ब आणि 364 अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी 90 दिवसांत हे आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणी जितेंद्र आव्हाड अटक देखील झाली होती. फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या अनंत करमुसे नावाच्या व्यक्तीचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. आरोपानंतर जितेंद्र आव्हाड स्वत: वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. कोर्टानं 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली होती.