पुणे । भ्रमर वृत्तसेवा : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ बोरघाटात सहा गाड्या एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात (Major accident on Mumbai Pune Expressway) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये २ कंटेनर, एक वेन्यू कार, एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि एका स्विफ्ट गाडीचा समावेश आहे. तर या अपघातात वेन्यू कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्या दरम्यान चिरडल्या गेलेल्या स्विफ्ट कारमधील गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१) आणि 4) मयूर दयानंद कदम, (तुळजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान या अपघातातील जखमींना पनवेलच्या (Panvel) एम जी एम रूग्णालयामध्ये (hospital) दाखल करण्यात आले असून घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस (Police) दाखल झाले असता या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. तसेच सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.