औरंगाबाद । भ्रमर वृत्तसेवा : विवाह समारंभ आटोपून नाशिककडे परतणाऱ्या आयशर ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने धडक दिल्याने वैजापूर तालुक्यातील शिवराई फाट्याजवळ पहाटे 3 च्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक (Nashik) एमआयडीसी अंबड येथील वऱ्हाड जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथे लग्नाला गेले होते. घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या भीषण अपघातात कविता बाबासाहेब वडमारे (वय 45 वर्ष), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय 17 वर्ष) मुलगा नामे दिपक वर्हाळे (वय 8 वर्ष),ललिता पवार (वय 48 वर्ष) सर्व राहणार अंबड जि. नाशिक, यांचा जागीच मृत्यू झला आहे. तर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार कळवण्यात आला. तसेच परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरीत जखमींवर रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत.