पुणे । भ्रमर वृत्तसेवा : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. तर दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तसेच बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. तर अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र असणार आहे.
तर दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रे मिळाली असून बारावीसाठी १४ लाख ७२ हजार ५६५ आवेदन पत्रे प्राप्त झाली आहेत. तसेच एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. तर जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन असून महत्वाचे म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल असे शरद गोसावी यांनी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार असून शाळा तिथे परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील असेही शरद गोसावी यांनी यावेळी सांगितले.