मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात असून सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
तर सुरूवातीला पोलिसांनी विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण परिसराचा चार्ज घेतला होता. त्यानंतर पोलिसांना मोठा फौजफाटा बोलवावा लागला.
दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणे योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्य असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.