समीर वानखेडेंना ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; ‘त्या’ बारचा परवाना केला रद्द

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या मुलाला क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक केल्या प्रकरणानंतर वादात सापडलेल्या एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडेंना जबर दणका बसला आहे. नवी मुंबईतील त्यांच्या मालकीचा बार असलेल्या सद्गुरू रेस्टॉरंटच्या बारचे लायसनच रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदगुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द केला असून या हॉटेलचे मालक समीर वानखेडे आहेत. १९९७ साली परवाना काढताना वानखेडे यांनी आपले वय चुकीचे दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.तसेच समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्टॉरंटचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्टॉरंटचा नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

दरम्यान यासंदर्भात समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी सांगितले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!