मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):– गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे दहीहंडीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी साठी असे निर्बंध नाहीत. सोबतच सरकारनं सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे. मुंबईत खासकरुन दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असता. असे असले तरी गोविंदांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतात.

दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसे आणि भाजपने पुढाकार घेतला आहे.
काही दिवसांवर आता दहीहंडी येऊन ठेपली आहे. त्याची तयारी सगळीकडेच सुरु झाली आहे. मानवी मनोरे रचण्याच्या सरावासाठी गोविंदा रात्री जागवत आहेत. प्रत्यक्ष दहिकाल्याच्या दिवशी नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणार्या गोविदांना मनसेकडून ‘सुरक्ष कवच’ देऊ केले आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणार्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे.

या योजनेनुसार, गोविंदाच्या अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपये असं विमा सुरक्षा कवच मनसेच्यावतीने मिळणार आहे. तरी या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आले आहे.