रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि कारचा आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याचेही नंतर निधन झाले आहे. या अपघातामध्ये हेदवी, सावंतवाडी आणि डावखोतमधील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मूळचे डावखोतमधील आणि मुंबईत वास्तव्यास असलेले पंडित कुटुंब संपूर्णपणे या अपघातामध्ये संपले आहे. निलेश पंडित, मुद्रा पंडित, नंदिनी पंडित आणि भव्य पंडित यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कामानिमित्त असलेले पंडित कुटुंब जाधव कुटुंबासोबत नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी गावी निघाले होते. ते मुंबईहून गुहागरकडे इको गाडी नं. एमएच ४८ बीटी ८६७३ या गाडीमधून जात होते. इको गाडीमधून १० जण प्रवास करत होते. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेपोली गावाजवळ ट्रक आणि इको कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मूळचे डावखोतमधील असणारे आणि मुंबईत मेडिकलमध्ये काम करणारे निलेश पंडित (४५), त्यांची पत्नी नंदिनी पंडित (३५), त्यांची कन्या मुद्रा पंडित (१२) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, भव्यवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, चार वर्षाच्या भव्यची झुंज देखील अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला. या अपघातामध्ये डावखोतमधील संपूर्ण पंडित कुटुंबाचा अंत झाला.
अपघातामधील इतर मृतांची नावे
दिनेश रघुनाथ जाधव, अमोल रामचंद्र जाधव, अनिता संतोष सावंत, कांचन काशिनाथ शिर्के, लाड मामा, निशांत जाधव, यातील दिनेश जाधव हे नंदिनी पंडित यांचा सख्खा भाऊ आहे.