नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकने हुलकावणी दिल्याने बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामध्ये एसएमबीटीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे पंचवीस विद्यार्थी व कर्मचारी जखमी झाले आहेत. या जखमींना आडगाव नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिक येथून धामणगाव येथे असलेल्या एसएमबीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन महाविद्यालयाची एम एच 15 ईएफ 2526 या क्रमाकाची बस औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील तपोवनाजवळ असलेल्या हॉटेल मिर्ची येथील वळणावर आली असता औरंगाबादवरून येत असलेल्या ट्रकने बसला हुलकावणी दिल्याने ती पलटी झाली आणि त्या बसमध्ये असलेले सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. तर याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.