नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : लग्नाहुन घरी परतत असताना आंध्रप्रदेशात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकासह सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव वेगात आलेल्या लॉरीने कारला धडक दिल्याने कारमधील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली गावात हा अपघात घडला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना वाटेतच मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Andhra Pradesh | 8 people died & 1 critically injured after a car in which they were traveling hit a lorry at Budagavi village of Anantapuram district. Police registered a case & further investigation underway: Venkata Swamy, Sub Inspector of police, Uravakonda Police Station
— ANI (@ANI) February 6, 2022
दरम्यान मृत्यू झालेले सर्व लोक हे उरवाकोंडा येथील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते. तसेच या घटनेची माहिती मिळताच उरवाकोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.