वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 19 वर्षीय तरुणीने मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला जात आहे.
या प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. दमानिया या मंगळवारी या प्रकरणी थेट वसई पोलीस ठाण्यात पोहोचल्याचं पाहायला मिळालं.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणीची ओळख रेवती निळे अशी असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. रेवतीच्या आत्महत्या प्रकरणात जाब विचारण्यासाठी अंजली दमानिया सई पोलीस ठाण्यात पोहोचल्या. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने 28 एप्रिल 2025 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती.
मांत्रिक कनेक्शन काय?
अजय राणा या मंत्रिकाचा मुलगा आयुश राणासोबत रेवतीचे प्रेमसंबंध होते. मात्र कुंडलीत मृत्यू योग असून, तू खालच्या जातीची आहेस त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझे लग्न होऊ शकत नाही असे तिला अजय राणाने सांगितलं. यानंतर रेवतीने नैराश्यात गेली. त्यानंतर तिने याच नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मांत्रिक आजय राणा हा वसईच्या किल्ल्यातील मंदिरात अनधिकृतपणे ठाण मांडून तेथे जादूटोणा करायचा. त्याचे पोलिसात चांगले संबंध असल्याने पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करत नाहीत असं अगदी किल्ल्यातील अघोरी प्रकारांच्या फोटोसीत आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुरातत्व खात्याच्या बेजबाबदारपणावरुनही हल्लाबोल केला जात आहे.
राजकीय दबाव असल्याचा आरोप
याबाबत वसई पोलीस ठाण्यात मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मंत्रिकाविरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा वसई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला जात आहे. वसई पोलिसांनी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया थेट वसई पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्या. या प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असं अंजली दमानियांनी पोलिसांसमोर आपलं म्हणणं मांडताना म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या नेत्याचा प्रकरणाशी संबंध?
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी राजकीय दबाव आणला म्हणून पोलिसांनी मयत तरुणीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही असा आरोप करण्यात आला आहे. स्वत: अंजली दमानिया यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमोर दबाव आणला होता का याचा जाब ही विचारला आहे. त्यावर या प्रकरणात माझा काही संबंध नाही आणि मी या दोन्ही पार्टींना ओळखतसुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. रेवतीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी वसईत आले आणि न्याय मिळेपर्यंत मी लढणार आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.