गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन आणि गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोबतच हा दिवसही शिक्षकवर्गासाठी फार महत्त्वाचा असतो.
भारतात पूराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत. त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूगृही राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जाते. या वर्षी ‘१० जुलै’ ला गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.
गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमा माहिती आणि गुरूपूजन
गुरूपौर्णिमेला ‘गुरूपूजन’ करण्याची पद्धत आहे. गुरूपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपुजा करणे. मात्र गुरूपूजन म्हणजे केवळ गुरूची पाद्यपुजा करणे अथवा गुरूला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही. गुरूला नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी हे खरं गुरूपूजन नक्कीच नाही. कारण खऱ्या गुरूला अशा दिखाव्याची मुळीच गरज नसते. गुरूपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरू बद्दल कृतज्ञ असणं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरूपूजन. अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरूला खरा आनंद होत असते. खऱ्या गुरूसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.