राज्यासह शहरात पावसाने कहर केला असून कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कालरात्री पासून सुरु असलेल्या सततच्या पावसाने नद्या नाले तुडुंब भरले आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरल्याने या हंगामात गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच पार्शभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगापूर धरणातूनसुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला होता. दरम्यान हा विसर्ग 1 वाजता 12,600 करण्यात आला आहे. परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम पोलिस आयुक्त डाॅ संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी आज दुपारी होळकर पुलावरून रामकुंड व गोदावरी नदी परिसरातील पुराची पाहणी केली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते.
नागरिकांनी नदी काठावर गर्दी करू नये
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस, मनपा, जिल्हा परिषद प्रशासनाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता नागरिकांनी नदी काठावर गर्दी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.