एअरटेल कंपनीने घेतलेल्या एका निर्णयाने एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता एअरटेल नव्या प्लॅनमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की.
एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही दिसत नाहीत. कंपनीने 12 ऑगस्ट 2026 पासून देशभरातील हे चार प्लॅन हटवले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कंपनीने प्लॅन का बंद केले?
अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या वेळोवेळी आपला प्रति ग्राहकामागील नफा वाढवण्यासाठी आणि नेटवर्क टॅरिफचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या प्लॅनमध्ये बदल करत असतात. बंद करण्यात आलेले हे चारही प्लॅन 28 दिवसांपासून 84 दिवसांपर्यंतच्या व्हॅलिडिटीसह येत होते. यामध्ये दररोज 1.5GB ते 2GB डेटा मिळत होता. हे प्लॅन हटवल्यानंतर एअरटेलचा उद्देश आपल्या प्लॅनची यादी अधिक सोपी करणे आणि ग्राहकांना वेगवेगळ्या डेटा लिमिट किंवा डिजिटल बेनिफिट्स असलेल्या रिचार्ज पर्याय देणे असा असू शकतो.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
299 रुपयांचा प्लॅन बंद झाल्यामुळे दर महिन्याला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा वापरणाऱ्या ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. अनेक ग्राहकांसाठी हा प्लॅन पहिली पसंती होता. त्याचप्रमाणे 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या मिड-टर्म प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाही आता रिचार्जसाठी आपले बजेट वाढवावे लागू शकते. अशा प्रकारे कंपनीने थेट प्लॅनच्या किमती वाढवल्या नसल्या तरी ग्राहकांचा रिचार्जवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोबाइल ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) येत्या काही महिन्यांत आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड टॅरिफ प्लॅनच्या किमतींमध्ये 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत, याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.