दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13व्यांदा ध्वजारोहण केले असून यंदा प्रथमच लाल किल्ल्यावर संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन झाले.
ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे १३वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाची विशेष पार्श्वभूमी आहे. याच निमित्ताने लाल किल्ल्यावरील सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ला विशेष स्थान देण्यात आले. ८०वा स्वातंत्र्यदिन आणि ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर भारतीय सैन्याच्या वतीने २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या धुनांनी लाल किल्ल्याचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून लाल किल्ल्यावर उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त विशेष स्मारक बॅनरही आकाशात झळकवण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान ज्ञानपथवर २,५०० एनसीसी कॅडेट्स आणि ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांनी ‘वंदे मातरम्’ची विशेष रचना साकारली. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात तब्बल १५ ते २० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि निमलष्करी दलांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी १,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवली जात आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे ५ हजार विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले आहेत. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतानाचा भव्य सोहळा, २१ तोफांची सलामी, आकाशातून झालेली पुष्पवृष्टी आणि ‘वंदे मातरम्’च्या विशेष सादरीकरणामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष ठरला आहे.