पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांच्या पंखांची एकमेकांशी टक्कर झाली. इंडिगोचे विमान टॅक्सीवेवरून जात होते, त्याचवेळी या विमानाचा काही भाग एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानावर आदळला. या अपघातात कोणतेही नुकसान झालेले नाही.
या अपघातानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आमचे एक विमान कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीवर चेन्नई, तामिळनाडूला जाण्यासाठी क्लिअरन्सची वाट पाहत होते. यावेळी, दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानाच्या पंखांची टोक त्याच्यावर आदळले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमानतळ प्राधिकरणाला सहकार्य करत आहोत. या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय झाली याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातानंतर डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकांवर कारवाई केली आहे. विमान वाहतूक कंपनीच्या या वैमानिकांना या एका दिवसाचा पगार मिळणार नाही. एअरलाइन्स उद्योगात ‘रोस्टर्ड ऑफ’ अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस मोजले जात नाहीत आणि त्या दिवशी त्यांना पगारही मिळत नाही. याअंतर्गत डीजीसीएने इंडीओच्या पायलटवर कारवाई केली आहे.