वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात सराकारकडून आता कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने आता निगेटिव्ह नंबर सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले तर लायसन्सवर निगेटिव्ह गुण नोंदवले जातील. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त गुण जमा झाले, तर लायसन्स निलंबित केले जातील अथवा लायसन्स रद्द होऊ शकते.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून दोन महिन्यात हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. रस्ते अपघात कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, त्यासाठी सरकारने हा नवा नियम आणला आहे.
नव्या सिस्टमनुसार, सिग्नल तोडणे आणि मर्यादापेक्षा वेगाने गाडी चालवणे यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जर ड्रायव्हिंग लायसन्सवर मर्यादापेक्षा जास्त नकारात्मक (निगेटिव्ह) गुण जमा होतील, त्या वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाईल अथवा कायमचे रद्द करण्यात येणार आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून पुढील दोन महिन्यात नवा नियम लागू केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतुकीचा नवा नियम कसा असेल?
नव्या नियमांनुसार, वेगमर्यादा ओलांडणे, सिग्नल तोडणे, बेफामपणे वाहन चालवणे यासारख्या उल्लंघनांसाठी ड्रायव्हरला नकारात्मक गुण दिले जातील. तीन वर्षांत 12 गुण जमा झाल्यास लायसन्स एक वर्षासाठी निलंबित होईल. निलंबनानंतर पुन्हा 12 गुण जमा झाल्यास लायसन्स पाच वर्षांसाठी रद्द होईल. याउलट, चांगल्या वाहनचालकांना बक्षीस म्हणून काही गुण मिळू शकतील, ज्यामुळे त्यांचे रेकॉर्ड सुधारेल.