बीड : शहराजवळील समनापूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोपी तरुणाकडून ‘लग्न कर नाही, तर पळवून नेईन’ अशी सतत धमकी मिळत असल्याने या तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुमित्रा राजू ईटकर (वय 22 वर्षे, रा. हिरापूर ता. गेवराई, हमु. बीड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, किशोर कचरू साठे (रा. गौतम बुध्द कॉलनी, बीड) व सम्यक संजय पारवे (रा. राजीव गांधी चौक, बिंदुसरा कॉलनी, हमु, मित्रनगर, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा ही बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होत होती. गेल्या 3 वर्षापासून तिची किशोर साठेशी ओळख होती. या ओळखीमधून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता. एवढेच नाही तर माझ्याशी लग्न कर नाही तर तुला पळवून नेईन व जीवे मारून टाकीन, अशी धमकी किशोर साठे सुमित्राला सतत देत होता. याचवेळी किशोरचा मित्र सम्यक पारवे याने देखील सुमित्राला लग्न करण्याकरता तिच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे या दोघांच्या जाचास कंटाळून अखेर सुमित्राने समनापूर शिवारामध्ये जाऊन एका विहिरीत उडी घेत आपला जीवन प्रवास संपवला.

दरम्यान, समनापूर शिवारामध्ये एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती गावामध्ये पसरल्याने ही घटना उघडकीस आली. तर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या हवाली सोपवण्यात आला आहे. तर मयत सुमित्राची बहीण संगीता लष्करे (रा. हिरापूर सोन्याबापू लष्करे ता. गेवराई हमु, वंजारवाडी ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात किशोर साठे व सम्यक पारवे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.