नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) ः– सरकारी नोकरीसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी खुशखबर दिली आहे. पुढील दीड वर्षांत 10 लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे.

आज सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख बेरोजगारांची भरती करावी, असे निर्देश दिले, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बेरोजगारीच्या मु्द्यावरुन विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर टीका करत असतात. राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षाचे नेतेही मोदींवर हल्लाबोल करत असतात. बेरोजगारीच्या मु्द्यावरुन सरकारवर दबाव निर्माण करत आहेत. एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकार्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितले होते. तर, फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या सरकारी आकड्यांनुसार 1 मार्च 2020पर्यंत केंद्र सरकारमधील विभागात 87 लाख पदे रिक्त आहेत.
पीएमओ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटवर रणदीप सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मागील 50 वर्षांच्या हिशोब केल्यास बेरोजगारीचा दर वाढला आहे. रुपयाची किंमत 75 वर्षांत घसरली आहे आणि इथे पंतप्रधान ट्विटर ट्विटर खेळून महत्त्वाच्या मुद्यांवरुन लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.