मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन मेट्रो शहराला एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा दौरा व कार्यक्रमाची माहिती समजून घेतली. उद्घाटन कार्यक्रमाला २० हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यामधील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होईल. नागपूर-मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या ‘समृद्धी महामार्गाची’ घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यामधून जरी हा महामार्ग जाणार असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्ये काय
- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे.
- नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक ८ तासात आणि मालवाहतूक १६ तासात शक्य होईल.
- कमाल गती घाटात प्रतितास १०० किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर १५० किलोमीटर आहे.
- महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदरातून आणि नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगभरात व्यापार करू शकतील.
- राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग
- हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी महत्वाचा ठरणार आहे.
- नागपूरमधील मिहान शी अनेक जिल्हे जोडले जाणार आहेत.