मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. या मंत्र्यांनी बंडखोरी केल्याने प्रशासकीय आणि सार्वजनिक कामे रखडली आहेत.

परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका आज सादर करण्यात आली. तसेच याचिकेत उपस्थित मुद्यावरून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

मात्र तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सात जणांनी ही याचिका दाखल केली असून, या मंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी बंडखोरी केली आहे. त्यांनी असे करून आपल्या घटनात्मक कर्तव्याशी प्रतारणा केली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.