मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. या नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी बंडाळी झाली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडत 40 आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. त्यानंतर या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस हे नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.