इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गावापासून अर्धा किलोमीटर दूरवर शिरसाठे येथील शाळकरी विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. १९) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पळवून नेण्याचा पर्यंत करण्यात आला होता.


अधिक माहितीनुसार, विद्यार्थी युवराज ज्ञानेश्वर सदगीर (वय १०), कपिल काशिनाथ सोपनर (वय १२) हे खेळण्यासाठी गेले होते. ह्या दोन बालकांना तिथून दोन अज्ञात व्यक्तींनी तोंड दाबून काळ्या स्विफ्ट गाडीत घातले. तिथून त्यांनी गाडी पुढे कुशेगावकडे नेली परंतु तिकडून बाहेर निघण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते परत त्याच रस्त्याने मुलांना घेऊन जात होते. मुले आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या व्यक्तीकडून दोन्ही मुलांना गप्प राहण्यासाठी मारहाण करण्यात आली. संबंधित शाळकरी विद्यार्थ्यांशी शिरसाठे येथील युवक भोरू सदगीर यांनी संवाद साधून माहिती घेतली. इगतपुरीनामा कडे याप्रकरणी त्यांनी माहिती दिली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नसली तरी सावधानता बाळगावी असे आवाहन भोरू सदगीर यांनी केले आहे.
भोरू सदगीर यांनी पुढे सांगितले की, ते बालकांना घेऊन त्र्यंबकेश्वरजवळ पहिने येथे जात असतांना त्या व्यक्तींनी पोलिसांना पाहिले. पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरु असल्याचे त्यांनी पाहताच त्यांनी पळ काढला. त्यामुळे या दोन्ही बालकांना गाडीतून उतरवून दिले. जाताना सांगितले की आम्ही परत येऊ. त्यानंतर मुलांनी रस्त्याने जाणाऱ्या दिंडीतील भाविकांना हा घडलेला प्रकार सांगितला. आम्हाला वाचवा आमच्या घरी फोन करा असे सांगितले. नंतर घरच्यांशी संपर्क झाल्यानंतर दोन्ही मुले घरच्या व्यक्तींच्या ताब्यात दिले.
ह्या घटनेमुळे शिरसाठे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणी अनोळखी व्यक्ती, अनोळखी गाडी दिसल्यास बारकाईने लक्ष ठेवावे. काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन भोरु सदगिर यांनी केले आहे.