पुणे : येथील दौंड तालुक्यामधील पारगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यामध्ये भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबामधील ७ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. या ७ जणांच्या मृतदेहात ३ लहान बालकांचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीनुसार, दौंड तालुक्यामधील पारगाव येथे भीमा नदीपात्रामध्ये ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, आता या प्रकरणात धक्कदायक ट्विस्ट समोर आला आहे. कुटुंबामधील नातेवाईंकानीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचे समोर आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये आढळलेल्या ७ जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ४ जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे छोटू(५), रितेश (७) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीमध्ये आढळले होते. १७ तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज मधून दौंड तालुक्यामधील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु, शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते.
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अधिक खोलात जाऊन चौकशी केली. तरी देखील नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते. त्यावर पोलिसांनी तपास केला असता. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले आहे.