मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :– राज्यात मागील दोन आठवड्यांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्याने राज्यातील महविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर ठाण्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यातले शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत. 66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश मस्केंसमवेत 66 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपले समर्थन शिंदे गटाला दिले.

शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशात शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.