रायगड (भ्रमर वृत्तसेवा):- पती पत्नीच्या भांडणातून एका महिलेने 6 मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील बोरगाव येथे घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पती पत्नीच्या या भांडणात रोशनी (वय 10), करिष्मा (वय 8), रेश्मा ( वय 5), विद्या (वय र्4े), शिवराज (3 वय), राधा (3.5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा. पत्नी ही गृहिणी होती. काल सकाळच्या सुमारास काही कारणामुळे या दोघांचे भांडण झाले. याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर महिलेने रात्री आठ वाजताच्या सुमारास महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात घटनेची कबुली दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि पत्नी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे.