आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असणारे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादात उडी घेतली आहे.
देशाचा ध्वज तिंरगा नसून भगवा असायला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राज्यभरात मोठा गदारोळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे.
कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला होता. त्यामुळे, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे, असं वक्तव्य केलं आहे.
या देशात जो महायज्ञ सुरू आहे, तो विझू देता कामा नये. या महायज्ञाची सांगता, या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे, असंही ते म्हणाले आहेत.
पुढं बोलताना ते म्हणाले, शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आलं, आता पुढे काय? असा प्रश्न समोर आला. संभाजी महाराज छत्रपती झाले, केवळ पावणे 9 वर्षे छत्रपती म्हणून काम संभाजीराजेंनी केलं, आपल्या वडिलांना शोभेल असं काम त्यांनी केलं. वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवलं, नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आलं. संभाजी महाराजांची जी हत्या झाली, त्या भडव्या औरंग्याने नीचपणा केला असंही ते म्हणाले.
या सगळ्या प्रश्नांना उत्तर हिरोजी फर्जंद, शिवछत्रपतींचा भाऊ होता. तो सगळ्यांना म्हणाला, शिवाजी महाराजांची आठवण करा आपण रायगडला जाऊयात, महाराज शेवटी ज्या जागेवर होते तिथे जाऊयात. हे सर्वजण त्या जागेवर जाऊन बसले.
महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे-आडवे 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर आडवे राज्य केलं.
सारा देश पादाक्रांत केला, दिल्लीचं मुघलांच तक्त तोडलं, तुकडे केले आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 भगवा फडकवून 19 वर्ष हिंदवी स्वराज्याचे राज्य केलं. याची पुनरावृत्ती म्हणजेच हिंदुस्तानचा झेंडा तिरंगा नाही, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. तो परत लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या कामानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यांसमोर आहेत. त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेजासारखी आहे, ती मावळणार नाही. आता स्वातंत्र्य आहे, परंतु आम्हाला चंद्र हवा. एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला तर असं होता कामा नये. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करुन पाकिस्तानचा नायनाट करु, हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे, असंही भिडे आपल्या भाषणात म्हटले.