झारखंड : कावडियांना घेऊन जाणारी बस समोरून भरधाव येणार्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 18 कावडियांचा मृत्यू झाला आहे. झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यात हा अपघात झाला. देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या जमुनिया फॉरेस्ट परिसरात हा अपघात झाला. ही बस गॅस सिलिंडर घेऊन जाणार्या एका वाहनावर धडकली. त्यानंतर हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेकरूंनी भरलेली ही बस बाबा बैद्यनाथ धाममध्ये जलाभिषेक केल्यानंतर दुमका येथील बासुकीनाथ मंदिराकडे जलाभिषेक करण्यासाठी जात होती. पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ही बस मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या जमुनिया परिसरात आली. त्यावेळी अचानक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक आणि बस यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातात सुरुवातीला 5 कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी मृतांचा आकडा वाढल्याचे सांगत 18 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच बसमधील अनेक जण गंभीर जखमी असल्याचेही बोलले जात आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली. यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली. या अपघातातील जखमींना अपघातग्रस्त वाहनामधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व प्रवासी बिहारमधील बेतिया आणि गयाजी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर घटनास्थळी भाविकांचा आक्रोश, किंचाळ्या आणि रडारडीमुळे वातावरण सुन्न झाले होते.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी याबद्दल एक पोस्ट करत या घटनेची सविस्तर माहिती दिली. माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा बैद्यनाथ त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
या हृदयद्रावक घटनेबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आज सकाळी देवघरच्या मोहनपूर ब्लॉकमधील जमुनिया चौकाजवळ झालेल्या बस अपघातात बसमधील भाविकांच्या मृत्यूची अत्यंत दुःखद सूचना मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्यासोबत जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे. या अपघातात मरण पावलेल्या भाविकांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबियांना दुःखाच्या प्रसंगात सहनशक्ती देवो, असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.