नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- गोदावरी नदीच्या पाण्यात गटाराचे दूषित पाणी मिसळल्याने शहरातील बापू पूल परिसरातील नदी पात्रात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पर्यावरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही उद्योगांकडून घातक केमिकलयुक्त सांडपाणी गोदावरी नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. ड्रेनेजचे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे करण्यात आली होती.
त्या तक्रारीनंतर संबंधित प्रकल्पाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नदीपात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, अहवाल आल्यानंतर माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.