देशाच्या आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर होताच केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्राने कच्च्या खाद्यतेलावरील बेसिक कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) मध्ये १० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे देशभरातील नागरिकांना दरवाढीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
३१ मेपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावर ही सवलत लागू होणार आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ७०% खाद्यतेलाचे आयात करतो. ही आयात मुख्यत्वे इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील, अर्जेंटीना, रशिया आणि यूक्रेन यासारख्या देशांमधून होते.
पूर्वी या तीन प्रकारच्या खाद्यतेलावर २०% सीमा शुल्क होते, जे आता फक्त १०% करण्यात आले आहे. तसेच आयात शुल्क देखील २७.५% वरून आता १६.५% करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने हे शुल्क वाढवले होते, मात्र आता पुन्हा एकदा सामान्य ग्राहकांच्या हितासाठी त्यात कपात करण्यात आली आहे.