माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे आणि कुटुंबीय सध्या या ना त्या कारणावरून चर्चेत आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला झालेली अटक ते एकनाथ खडसे यांच्यावर त्यांच्याच मुलाच्या होत्याचे होणारे आरोप. पण आरोपांबद्दल स्वतः रोहिणी खडसे यांनी भाष्य केलं आहे. निखिल खडसेंसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं? याबाबत रोहिणी खडसेंनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत रोहिणी खडसे म्हणाल्या, ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यादिवशी असं काही वाटलं नव्हतं तो टोकाचं निर्णय घेईल. दिवसभर तो लग्न अटेंड करत होता. नंतर घरी आला. आई आणि रक्षाबरोबर चहा घेतला आणि बेडरूममध्ये गेला. नंतर रक्षा वहिनी आणि तो दोघेच रूममध्ये होते. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली? हे मला माहिती नाही. तिथे कुणीही नव्हतं.रक्षा वहिनी नंतर किचनच्या दिशेनं गेल्या आणि अचानक आईला कुणीतरी बंदुकीच्या गोळ्या झाडल्याच्या आवाज आला.
तिनं थेट निखिल दादाच्या रूममध्ये धाव घेतली. तेव्हा दादा बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्या दोघींनी सरपंच नारायण चौधरी आणि इतरांना मदतीसाठी फोन केला. कारण त्यावेळेस बाबा घरी नसून बाहेर होते. घटनेच्या दिवशी मी पुण्यात होते. माझी परिक्षा तर, बाबा लग्नासाठी मुक्ताईनगरला गेले होते. तेव्हा गावातील लोकांनी त्याला रूग्णालयात नेलं. या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीत. सर्व गावाला माहित आहे, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी दिली.
निखिल यांच्या ऑपरेशनबाबत रोहिणी खडसे यांनी माहिती दिली. 'निखिलला पाठीचा त्रास होता. मणक्याची नस दबली गेली होती. त्यावेळी काही कारणास्तव ऑपरेशन करणं शक्य झालं नव्हतं. त्याची सहनशक्ती संपली होती. पेन किलर घेतल्यानंतर त्याला बरं वाटायचं पण नंतर परिस्थिती तीच..त्यानं हा निर्णय का घेतला, हे अद्याप मी समजू शकले नाही', असं रोहिणी खडसे म्हणाल्या.