ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना भारतीय वनडे क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.सध्या श्रेयस अय्यरवर सिडनीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दुखापतीतून सावरताना, त्याला काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
श्रेयसच्या प्लीहाच्या दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याने इंटरव्हेंशनल ट्रान्स-कॅथेटर एम्बोलायझेशन केले. शरीरातील कोणत्याही भागात अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या अंतर्गत दुखापतीमुळे अय्यर दोन महिन्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहू शकतो. हा टीम इंडियासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
या काळात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत अय्यरची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. पुढे ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका आहे. तोवरही अय्यर तंदुरूस्त होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. परिणामी, टीम इंडियाला एकदिवसीय सामन्यांसाठी तात्पुरता नंबर ४चा नवा फलंदाज शोधावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले, "श्रेयसची प्रकृती झटपट सुधारतेय. जीवाचा धोका टळला आहे. श्रेयसवर शस्त्रक्रिया झालीच नाही. ती वेगळी प्रक्रिया होती. श्रेयस अय्यरसंदर्भात एक प्रक्रिया करण्यात आली जी अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करण्यात आली होती. म्हणूनच तो इतक्या लवकर बरा झाला. त्याची प्रकृती डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. सामान्यपणे अशा प्रकारची दुखापत झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ आठवडे लागतात. असे त्यांनी म्हटले आहे.