भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडीआधी सर्वाधिक चर्चा होत आहे ती श्रेयस अय्यरच्या नावाची. श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत गंभीर दुखापत झाली होती.
झेल पकडताना डाइव्ह मारणं त्याला चांगलंच महागात पडलं होतं. त्याच्या स्प्लीनमध्ये दुखापत झाली आणि आतच रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर दोन महिने मैदानापासून दूर राहीला. या दरम्यान त्याचं सहा किलो वजन कमी झालं आहे. त्याला आपलं वजन नियंत्रण आणण्यासाठी दुखापतीतून पूर्णपणे सावरणं गरजेचं आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यासाठी श्रेयस अय्यर पुढे एक अट ठेवण्यात आली आहे. ही अट पूर्ण न केल्यास त्याला टीम इंडियात जागा मिळणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून रिटर्न टू प्लेच्या मंजुरीसाठी दोन मॅच सिम्युलेशन सेशन्स पास करावे लागतील.
श्रेयस अय्यरने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चार सेशन पास केले आहेत. पण त्याची सध्याची फिटनेस पाहता आणखी दोन सामन्यांचं सिम्युलेशन सत्र आयोजित केलं जाणार आहे. २ जानेवारी आणि ५ जानेवारीला हे सत्र आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरचं संघात खेळणं कठीण आहे. श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन आधीच होणार होतं. पण त्याच्या रिकव्हरी काम करणाऱ्या वैद्यकीय टीमने त्याचे मसल मास कमी झाल्याचं निरीक्षण केलं. त्यामुळे त्याला आणखी एका टेस्ट गरज आहे.
श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड झाली तर ऋतुराज गायकवाडला फटका बसू शकतो. कारण अय्यरच्याा गैरहजेरीत ऋतुराज गायकवाडने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तसेच शतकही ठोकलं होतं.