टीम इंडियाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला इडन गार्डन्समधील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी गुंडाळलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या सत्रात 55 षटकांमध्ये 159 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेला झटपट ऑलआऊट करण्यात वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिलं. तसेच फिरकीपटूंनी निर्णायक भूमिका बजावली. बुमराहने केशव महाराज याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आणि दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप केलं. बुमराहने यासह 5 विकेट्स घेतल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यासाठी कर्णधार शुबमन गिलने भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल केले आहेत. या सामन्यासाठी गिलने प्लेइंग ११ मध्ये ६ डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यासह ४ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं आहे.
सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या प्लेइंग ११ मध्ये ११ पैकी ६ खेळाडू डावखुरे आहेत. ज्यात वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. हे भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी भारतीय संघ कधीच ६ डावखुऱ्या खेळाडूंसह मैदानात उतरलेला नाही. गिलने घेतलेला हा निर्णय योग्य ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यासह भारतीय संघाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये ४ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं आहे. ज्यात ३ डावखुऱ्या गोलंदाजांचा समावेश आहे. ज्यात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलचा समावेश आहे.