आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पोलिसांच्या या कृतीला उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध केला. मनसेने वांगचुक यांच्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर त्यांना भेटण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे दिल्लीतील जंतरमंतरवर पोहचले. आजच्या या घडामोडींवर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
माझ्या माहितीनुसार, सोनम वांगचुक हे थोड्यावेळाने पत्रकार परिषद घेणार आहेत. लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला ते ऐकावंच लागेल, कारण या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलं आहे. ज्यांनी तुम्हाला तिकडं बसवलं, त्यांचचं म्हणणं तुम्ही ऐकणार नाहीत का? खूप चुकीच्या दिशेने आपला देश जात आहे, असा आरोप मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला.
अभिजीत दीपके यांना सकाळपासून काय झालं याची विचारपूस केली. वांगचुक यांना पडदा लावून घेऊन गेले. चार पाच पोलीस साध्या वेषात आले होते. त्यांनी त्यांना उचलून नेले. वांगचुक यांची तब्येत कशी आहे याची विचारपूस केली. आमच्या दोघांचंही हेच म्हणणं आहे की आंदोलन आता देशभर पोहचलं पाहिजे. महाराष्ट्रातही आंदोलन करण्याविषयी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठरवू. चर्चा केल्यावर या आंदोलनाची दिशा ठरेल, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अभिजीत दीपके यांना पोलिसांनी मारहाण केली. शिविगाळ केली हे अत्यंत चुकीचं आहे. हायकोर्टाने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं का? असा सवाल त्यांनी पोलिसांसह सरकारला विचारला. वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घ्या असे हायकोर्टाने सरकारला सांगितले आहे. ते सोडून या सरकारने सगळं केलं, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला.
विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, तरी हे सरकार शांत आहे. विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं, यासाठी हे सरकार जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी केला. तर हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. तर दिल्लीतील आंदोलन देशभरात पोहचले पाहिजे अशी हाक अमित ठाकरे यांनी दिली.