दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सध्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला आहे. हे आरोप म्हणजे ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. राऊत यांच्या मते, हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले असून, न्यायालयाने सीबीआय चौकशीस परवानगी दिली असली तरी, तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राऊत यांनी स्पष्ट केले की, जेव्हा हे प्रकरण तपासले जात होते, तेव्हा राज्यात शिवसेनेचे सरकार नव्हते.
देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असताना मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला आणि आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये आदित्य ठाकरेंचा दिशा सालियन प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांची दखल घेऊन तपास करण्यात आला होता. तरीही, राजकीय हेतूने प्रेरित होऊन वारंवार या विषयावर चर्चा केली जात असून, त्यातून त्या मुलीच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचे राऊत यांनी म्हटले.