पावसाळा निसर्गाला जरी हिरवागार करीत असला तरी तो त्वचेसाठी चांगला असेलच असे नाही, पावसाळा हा ऋतू अनेकदा त्वचेच्या अनेक समस्या घेऊन येतो. वातावरणातील वाढलेली आर्द्रता, घाम, प्रदूषण आणि त्वचेतील तेलकटपणा यामुळे मुरुमे, पुरळ आणि त्वचेवरील सूज अशा समस्या वाढू लागतात.
"पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर जास्त तेल आणि घाम जमा होतो. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि जिवाणूंची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते, ज्यामुळे पिंपल्सची समस्या वाढते."
पावसाळ्यात पिंपल्स वाढण्याची मुख्य कारणे
प्रदूषित पाणी: पावसाचे पाणी अनेकदा आम्लयुक्त किंवा प्रदूषित असू शकते. अशा पाण्याच्या थेट संपर्कात आल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.
वाढलेली आर्द्रता: हवेतील जास्त ओलाव्यामुळे त्वचा चिकट होते, ज्यामुळे घाम, तेल आणि धूळ त्वचेवर जमा होऊन छिद्रे बंद होतात.
जिवाणू आणि बुरशीची वाढ: दमट हवामान हे जिवाणू आणि बुरशी यांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते. पावसात भिजल्यानंतर त्वचा व्यवस्थित कोरडी न केल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
आधीपासून असलेल्या समस्या: ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा ज्यांना आधीपासून मुरुमांचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा ऋतू अधिक धोकादायक ठरू शकतो.
निरोगी त्वचेसाठी उपाय
भरपूर पाणी प्या: आहारात ताजी फळे, भाज्या आणि भरपूर पाण्याचा समावेश करा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
आहारावर लक्ष द्या: जास्त तेलकट, मसालेदार आणि जंक फूड टाळा. यामुळे शरीरातील उष्णता वाढून पिंपल्स येऊ शकतात.
चेहरा स्वच्छ धुवा: दिवसातून किमान दोनदा चांगल्या फेसवॉशने चेहरा धुवा, जेणेकरून अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाईल.
त्वचा कोरडी ठेवा: पावसात भिजल्यास किंवा घाम आल्यास त्वचा लगेच स्वच्छ आणि मऊ कापडाने पुसून कोरडी करा.
हलके मॉइश्चरायझर वापरा: त्वचेला तेलकट न बनवणारे (Non-Comedogenic) आणि हलके मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही.
घरगुती उपाय: कडुलिंबाची पेस्ट, कोरफड जेल, गुलाब पाणी किंवा हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे किंवा ज्यांना मुरुमांचा गंभीर त्रास आहे, त्यांनी कोणताही नवीन उपाय किंवा घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.