भारत-पाक यांच्यातील युद्धामुळे मुळात भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये असे म्हटले जात असताना भारत क्रिकेट सामना खेळवला गेला, हा सामना जिंकल्यानंतर भारतात कुठे उत्साह पहायला मिळाला तर कुठे नाराजी. नाराजीचं कारण हेच की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होऊच नये अशी मागणी देशातून अनेकांकडून करण्यात येत होती. दरम्यान येत्या रविवारी भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी मैदानात दोन हात करणार आहे.
पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा ११ धावांनी निसटता पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याशी नाणेफेकीच्या वेळी हात मिळवला नव्हता.
त्यानंतर भारतीय संघाने सामना संपल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडुंशी हात मिळवायला नकार दिला होता. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने भारताच्या 'या' कृतीविषयी आणि सूर्यकुमार यादवच्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबातच्या टिप्पणीविषयी आयसीसीकडे तक्रार केली होती. आयसीसीच्या समितीने सूर्यकुमार यादवला चौकशीसाठी बोलावून ताकीद दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सूर्यकुमार यादव याला सध्या फक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्याच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ही कारवाई दंडात्मक स्वरुपाची असेल. कदाचित सूर्यकुमार यादव याच्या मानधनातील काही रक्कम कापली जाऊ शकते. मॅच रेफरी आणि माजी क्रिकेटपटू रिची रिचर्डसन यांनी सूर्यकुमार यादवची चौकशी केली होती. यावेळी त्याठिकाणी बीसीसीआयचे सीओ हेमंग अमीन आणि सुमीत मल्लापुरकर हेदेखील उपस्थित होते.