बिहारच्या गया जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रील बनवण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरलेल्या लेकरांसोबत दुर्दैवी घटना घडली या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील खिजरासराई पोलीस स्टेशन परिसरातील केनी पुलाजवळ गुरुवारी ही दुःखद घटना घडली.
नेमकं काय घडलं ?
शाळेतून परत येताना नऊ विद्यार्थी नदीत आंघोळ करत होते, त्यावेळी रील बनवण्याचा मोह त्यांना आवरला नाही त्यासाठी ते आणखी खोल पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने ते बुडाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर या नऊ जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना लगेचच बेलांगज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून एकाच वेळी पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. तर सात किशोरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.