दैनिक भ्रमर : मोबाईलमुळे माणूस जवळ आला आणि नाती मात्र दुरावली. सतत मोबाईलवर बोलणे , व्हिडीओ बघत असणे यामुळे आरोग्यही बिघडलं. पण याकडे मात्र अनेक जण दुर्लक्षच करत आहे. यू ट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्सवर तरुणाई सतत स्क्रोल करत बसलेली दिसत आहे. यामुळे अनेक गंभीर परिणाम होत आहे.
थोडा वेळ काही रील्स पाहत आहात तर ठीक पण सलग एका मागून एक रील्स पाहणं घातक आहे. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सोशल मीडिया हे आभासी जग पण त्यात मन रमू लागतं. तेच खरं वाटू लागतं. त्यामुळे खऱ्या जगाशी, आजूबाजूच्या लोकांशी संपर्क तुटतो. घरातल्या लोकांशी, मित्र - मैत्रिणीशी संवाद कमी होतो. एकटेपणा आवडू लागतो. आभासी दुनियेत मन रमू लागतं. त्यातली प्रत्येक गोष्ट खरी वाटू लागते
त्यामुळे स्वतःशी कळत नकळत तुलना होऊ लागते. त्यातून चिडचिड वाढते. तासनतास रील्स पाहिल्याने स्मरणशक्ती कमकुवत होते. विविध विषयांवर रील्स असतात त्यामुळे काही सेकंदामध्येच भावना बदलत जातात याचा मनावर परिणाम होतो. मेंदूही थकतो त्यामुळे एकाग्रता भंग पावते. अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे गोंधळ उडतो. डोळ्यांवर ताण येतो. हाताची बोटं आणि मान यावरही एका विशिष्ट अवस्थेत फार वेळ बसल्याने गंभीर परिणाम होतात. अनेक वेळा निद्रानाशाची समस्या उद्भवते. त्यामुळे मनोरंजन हवं म्हणून वेळेचा असा अपव्यय नको. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
एकामागून एक ३० सेकंदांचे व्हिडिओ पाहण्याची सवय लागल्याने आपल्या मेंदूला सतत बदल पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे वास्तव जीवन अधिक कंटाळवाणे वाटू लागते. हळूहळू व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते. जेव्हा लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. तेव्हा हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) विकार होऊ शकतो. या विकारामुळे लोक गोष्टी विसरायला लागतात. अस्वस्थ राहतात आणि एकाच ठिकाणी बसण्यात अडचण येते. तसेच नैराश्यही लक्ष विचलित होण्यामागचे एक कारण आहे.