अभिनेत्री ते नेत्यापर्यंतचा प्रवास केलेली कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे लक्ष वेधून घेतलं आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पाकिस्तानला "आतंकवाद्यांनी भरलेला एक वाईट देश" असे म्हटले असून, "त्याला जगाच्या नकाशावरून कायमचं नष्ट केलं पाहिजे" असे देखील म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर'नंतर घाबरलेल्या पाकिस्तानने 8 मे रोजी भारताच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा नापाक प्रयत्न केला, मात्र भारतीय सशस्त्र दलांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
हे ड्रोन हल्ले जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू, सांबा, सतवारी आणि उधमपूर, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर तसेच राजस्थानमधील बीकानेर आणि जैसलमेर या भागांमध्ये करण्यात आले होते. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यांनंतर कंगना रणौत हिने तिच्या इन्स्टाग्रामवर WION या वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टला रीपोस्ट केलं आहे.
या रिपोर्टमध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानकडे चौकशी करण्यात आली होती. या रिपोर्टसोबत कंगनाने पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत लिहिलं आहे – “ब्लडी कॉक्रोच... भीषण, दहशतवाद्यांनी भरलेला वाईट देश... जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं पाहिजे,” असे म्हणत तिने आपला संताप व्यक्त केलाय.