भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जादूटोणा, तंत्र-मंत्र आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे समोर येत आहे. अनेक बडे राजकारणी आणि मंत्री या भोंदूबाबाच्या दरबारी हजेरी लावत असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक मर्मभेदी पोस्ट लिहली आहे.
काय आहे अतुल कुलकर्णी यांची ती पोस्ट?
पकडले गेले कीच आणि तरच 'भोंदू'?
त्या आधी ते काय असतात?
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?
ज्या वेळी कुणी 'महाराज' भोंदू 'निघतात, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय ?
डोळस आणि अंध श्रद्धांमध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे?
आंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते ?
हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?
अतुल कुलकर्णी यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी "सध्याच्या काळात असे प्रश्न विचारण्याची हिंमत हवी," अशा कमेंट्स केल्या आहेत. खरातसारख्या भोंदूंना वेळीच ओळखण्यात समाज का अपयशी ठरतो, हा अतुल कुलकर्णींचा प्रश्न आता पोलीस तपासाइतकाच महत्त्वाचा ठरत आहे.